Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Saturday, 9 October 2021

संतुलित मन, समाधानी जीवन

आपल्या मनाला कसं सांभाळावं


जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या जर ढिल्या सोडल्या तर त्यामध्ये नाद निर्मिती होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. तसंच आपलं देखील आहे. आपलं शरीर हे यंत्र आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतूलन असणं गरजेचं आहे. शरीराचं यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपलं मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवूण ठेवणं गरजेचं आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पाय दुखतोय, गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो तसंच जरासंही मन दुखलं तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मन आनंदी नसेल तर आपण समाधानी राहू शकत नाहीत.


ताण - तणाव घालवण्यासाठी सोपे उपाय


सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आवडीचा छंद जोपासणं गरजेचं आहे. सर्वांनी खेळायला पाहिजे कारण खेळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगण्याचं शिकवत असतं. खेळामुळे आपण खूप आनंदी राहत असतो. वर्तमानात कसं आनंदी रहावं हे आपण खेळातून शिकतो. जसं की एखाद्या खेळाडून गोल केला तर तो आनंद साजरा करतो त्याला याची चिंता नसते की आपण उद्याचा सामना जिंकणार की हारणार. तो फक्त आजचा क्षण आनंदानं साजरा करत असतो. त्यामुळे सर्वांनी खेळणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, सूर्य नमस्कार, योगा यामुळे देखील ताण तणाव खूप प्रमाणात कमी होतील. तसेच आपल्याला खूपच ताण जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे.


मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारणं


मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.


गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण


साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.


मानसिक रुग्णांबद्दल महत्त्वाची बाब


ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.


मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य प्रकार


तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो. आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.


मानसिक रुग्णाच्या प्रमाणात उपलब्ध मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक


तसं पाहिलं तर मानसिक रुग्णाच्या प्रमाणात खूपच कमी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक उपलब्ध आहेत. समाजातील संतुलन योग्य ठेवण्यासाठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. करिअरसाठी हे क्षेत्र चांगलं आहे.ज्यांना समाजासाठी काहितरी करायचं आहे त्यांनी निश्चितच याकडे वळणं योग्य राहिल. मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयात पदवी अथवा पदविका प्राप्त करुन समुपदेशानाचे कार्य करता येते. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशकामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कारण मानसिक रुग्ण हा पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी समुपदेशकाने त्यामध्ये सामावून जाता तटस्थ राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. कंटाळून न जाता त्याला वारंवार मार्गदर्शन करणं गरजेच आहे.



संदर्भ : आरोग्यविद्या डॉट कॉम

Thursday, 7 October 2021

मानसिक स्वास्थ्य संवर्धन

 

     सध्याच्या धकाधकीच्या, गतिमान व स्पर्धात्मक जीवनात ताणतणावाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कोविड १९ सारख्या महामारीने त्यामध्ये आणखी भर घातली आहे. अशा तणावजन्य परिस्थितीत सक्षमपणे उभे राहण्यासाठी आणि कार्यक्षम आयुष्य जगण्यासाठी शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य संवर्धनाची गरज आहे. जीवनातील संघर्ष, अपयश, नैराश्य, आघातजन्य , कौटुंबिक वंचितता यामुळे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते. अती मानसिक ताणामुळे व्यक्तीची मनःशांती कमी होते. अशा प्रसंगी मग व्यक्तीने नित्य जीवनाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण होते. मानसिक आरोग्याची जोपासना ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकाने स्वतःच्या दिनचर्येत आणि मनोवृत्तीत काही विधायक बदल करणे आवश्यक असते. सुखी व समाधानी जीवनाचे गुपित ग्रीकांनी फार पूर्वीच सांगितले आहे. आपले काम व आवडते कृत्य यांचा रोजच्या कार्यात समतोल राखला तर जगण्याचा उत्साह वाढतो. मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी नित्य जीवनाची पुनर्रचना करताना खालील बाबी आचरणात आणता येतील. 


१. कामाचे नियोजन करा

    आपल्या दैनंदिन कामात शिस्त राखणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीवर काही विशिष्ट कामांची जबाबदारी असते. व्यक्तीने आपले काम आवडीने व पूर्ण क्षमतेने करावे. तसेच कामातील जबाबदारी स्वीकारावी. कामाचे नीट नियोजन करावे. कामाचे नियोजन करताना कोणते काम जास्त महत्वाचे त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा. असे केल्याने काम वेळेत पूर्ण व पद्धतशीरपणे करायची सवय लागते. काम वेळेत पूर्ण झाले तर इतर छंद जोपासण्यासाठी, करमणुकीसाठी व समाजकार्यासाठी वेळ मिळतो. 


२. फावल्या वेळाचे नियोजन

    व्यक्तीला फावल्या वेळाचा उपयोग आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी होतो. फावल्या वेळेत स्वतःचे कलागुण विकसित करण्यासाठी गाणे, नाच, चित्रकला, भरतकला, विणकाम, वाद्य वाजविणे अशा कला शिकता येतात. हे छंद पुढे कामाचा ताण घालविण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी, करमणुकीसाठी उपयुक्त  असतात. 


३. नियमित आहार

    शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ, त्यामुळे योग्य वेळी नियमित आहार घेतला पाहिजे. शरीराला आवश्यक असणारी कार्यशक्ती पोषक आहार घेतल्याने मिळते. खाल्लेल्या अन्नातून पोषण मूल्ये शरीराला मिळावी यासाठी जेवताना व्यक्तीने प्रसन्न राहावे. वाचत किंवा टी. व्ही. पाहत जेवू नये. जेवताना गप्पा असाव्यात परंतु त्या गप्पा भांडण वाढवणाऱ्या, एकमेकांवर दोषारोप करणाऱ्या नसाव्यात. 


४. व्यायाम

    निरोगी आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. सध्या लोकांचे बैठे काम वाढले आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. व्यायाम केल्याने मन प्रसन्न राहते, कामात उत्साह वाढतो. शरीराप्रमाणे मनही लवचिक असणे गरजेचे असते. निराशाजनक, भीतीदायक विचारांना थांबवून मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी मनाचे व्यायाम आवश्यक असतात. 


५. सुसंवाद साधणे

    हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीत घरामध्ये परस्पर सुसंवाद कमी होत चालला आहे. घरातील व्यक्तींमध्ये परस्पर संभाषण होणे आवश्यक असते. अशा संभाषणातून एकमेकांच्या गरजा, अपेक्षा, विचार, भावना जाणून घेता येतात. एकमेकांशी बोलल्याने तसेच घरातील वातावरण मोकळे राहते. परस्परांच्या सुख-दुःखात सहभागी होता येते. 


६. झोप व विश्रांती

    सकस आहार, व्यायाम यासोबत शांत झोप व विश्रांती देखील मानसिक शांतीसाठी महत्वाची आहे. शांत झोप लागणे हे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. 


७. भावना व्यक्त करणे

     मानसिक स्वास्थ्यासाठी स्वतःच्या भावना स्वीकारा. राग, भीती, दुःख, आक्रमकता, हेवा, तिरस्कार या भावना सुद्धा मान्य करा. भावना टाळण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न करू नका. भावना व्यक्त केल्याने मन हलके होते. मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येक दिवशी थोडेतरी मनमोकळे हसले पाहिजे. हसण्यामुळे चेहऱ्याचे स्नायू, श्वसन संस्था व पचनसंस्था यांना चांगला व्यायाम मिळतो. आनंद व समाधान हे मानसिक स्वास्थ्याचा प्राणवायू आहेत. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका. 


८. व्यसने टाळा

    दुःख कमी करण्यासाठी काही व्यक्ती तंबाखू, दारू, मादकद्रव्य सेवनाच्या आहारी जातात. ही व्यसने ताण कमी करणारी नसून स्वास्थ्य बिघडवणारी असतात. त्यामुळे व्यसनांपासून दूर रहा. 


९. आत्मविश्लेषण करा

     स्वतःच्या वर्तनाचे, कृतीच्या परिणामांचे, विचारांचे वस्तुनिष्ठ परीक्षण करा. त्यातून स्वतःच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव होईल. त्यातून आपल्या वर्तनात सुधारणा करता येते. स्वतःचे विश्लेषण करताना न्यूनगंड मात्र निर्माण होऊ देऊ नका. 


१०. जगण्यावर प्रेम करा

    आयुष्यात धनात्मक आणि ऋणात्मक असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. सभोवतालच्या सुखद-दुःखद, चांगल्या-वाईट घटनांपैकी तुम्ही काय पहायचे हे तुमच्यावर अवलंबून असते. आयुष्यातील आव्हाने स्वीकारणे हे जगण्याचे सूत्र आहे. व्यक्तीने आशावादी वृत्ती जपली पाहिजे. आयुष्य अनिर्बंधपणे उधळून टाकू नये. होकारात्मक विचारांचा व कृतींचा व्यक्तीने निश्चय केला, तर व्यक्तीला स्वास्थ्य संपन्न, आनंदी, निरामय जीवन जगता येईल. 



 

Wednesday, 6 October 2021

समायोजन - यशस्वी जीवनाचा मूलमंत्र

  


         समायोजन ही मानवी जीवनातील एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याला इंग्रजीत Adjustment असे म्हटले जाते. व्यावहारिक भाषेत परिस्थितीशी, बदलाशी जुळवून घेणे तसेच जीवनात अंतर्गत सुसंगती टिकवणे याला समायोजन म्हणता येईल. मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने समायोजन ही रोजच्या जीवनात अतिशय महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. आपण जन्मापासून मरेपर्यंत आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक गरजा असतात. या सर्वच गरजांची पूर्तता होतेच असे नाही. बऱ्याचदा आपल्या ईच्छा, आकांक्षा, आवडी-निवडींना मुरड घालावी लागते तसेच आपल्या भावनांना आवर घालावा लागतो आणि समाजमान्य पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी लागते. यालाच समायोजन म्हणतात. 

      जीवनात आपणास अनेक समस्यांना किंवा संघर्षाला सामोरे जावे लागते. या समस्या सोडविण्यासाठी विविध मार्ग वापरावे लागतात, स्वतःच्या क्षमतांचा कौशल्यपूर्ण पद्धतीने वापर करावा लागतो. समस्यात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःमध्ये व परिस्थितीमध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे समायोजन होय. समायोजन म्हणजे योग्य मार्गाने केलेली तडजोड होय. ती निरतंर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या जीवनातील आनंदाचा उपभोग, जीवन समाधान, प्रगती ही बहुतांशी समायोजनावर अवलंबून असते. समाज, संस्कृती, नीतिनियम, सभोवतालचे वातावरण, अपेक्षा याचे भान ठेवून केलेले समायोजन आपणास मानसिक स्वास्थ्य टिकविण्यास मदत करते. 

       जरी अनेक ठिकाणी आपल्याला समायोजन करावे लागत असले तरी प्रामुख्याने तीन क्षेत्रातील समायोजनाचा आपण या ठिकाणी विचार करूया. 

१) वैयक्तिक समायोजन

      व्यक्तिगत समायोजन ही मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणता येईल. कारण हे समायोजन आपणच आपल्याबाबत करायचे असते. वैयक्तिक समायोजन करण्यासाठी स्वतःच्या क्षमता, मर्यादा, भोवतालची परिस्थिती, मिळणारी संधी याची योग्य जाणीव प्रत्येकाने करून घ्यावी. आपली ध्येये, उद्धिष्टये, जीवनाकडे पाहण्याचा 

दृष्टीकोन जितका वास्तव व सकारात्मक असेल तितके व्यक्तिगत समायोजन परिणामकारक होते. आपले वैयक्तिक समायोजन जितके चांगले असेल तितके संघर्ष, ताणतणाव, अपयश, नैराश्य आपण कौशल्यपूर्ण रीतीने हाताळू शकतो.


२) सामाजिक समायोजन

      वैयक्तिक समायोजनाइतकेच सामाजिक समायोजनास देखील महत्व आहे. आपण जर वैयक्तिक समायोजनात यशस्वी झालो तर सामाजिक समायोजन करणे सुलभ जाते. सामाजिक समायोजनात समाजमान्य वर्तन  करायला शिकणे, समाजाच्या अपेक्षा जाणून घेणे, समाजाच्या नितिनियमांचे पालन करणे, समाजाने मान्य केलेली भूमिका व दिलेले स्थान यास अनुसरून वर्तन करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव आपणास असायला हवी. समाजाप्रती प्रेम, आदर, आत्मीयता वाटायला हवी. बऱ्याचदा काही रूढी मान्य नसतात अशावेळी त्या बदलण्यासाठी त्यांना शरण न जाता समाजाची घडी बदलणारी कृती करायला हवी, परंतु ती करताना देखील बराच विरोध सहन करण्याची तयारी असावी लागते. हे ही एक प्रकारचे सामाजिक समायोजनच होय.  मानसिक स्वस्थतेसाठी सामाजिक समायोजन साधण्याचे उत्तम कौशल्य प्रत्येकाने विकसित करायला हवे. 


३) व्यावसायिक समायोजन

     नोकरी, व्यवसाय हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन आहे. आपल्या व्यवसायावर, नोकरीवर  आर्थिक-सामाजिक दर्जा, समाजाकडून मिळणारी किंमत अवलंबून असते. आपला व्यवसाय आपल्याला मानमरातब, आत्मप्रतिष्ठा मिळवून देत असतो. व्यवसायाची योग्य निवड, त्यासाठी योग्य प्रशिक्षण, व्यवसायातील सुरक्षितता, प्रगतीची संधी, आर्थिक मोबदला, कामाचे स्वरूप, कर्तव्ये व जबाबदाऱ्या, व्यावसायिक समाधान, सहकारी वर्गाशी सुसंबंध या गोष्टी व्यवस्थित हाताळता येणे म्हणजे परिणामकारक व्यावसायिक समायोजन होय. 


      वरील तिन्ही प्रकारच्या समायोजनाशिवाय भावनिक समायोजन, शालेय समायोजन, वैवाहिक समायोजन या प्रकारचे देखील समायोजन आपणास करावे लागते. जेंव्हा आपण विविध प्रकारचे समायोजन साधण्यात यशस्वी होऊ तेंव्हा आपण मानसिक दृष्टया शांत, स्थिर राहू शकतो. त्यासाठी आपल्याला अपयशातून ज्ञान घेत जीवन जगण्याची कौशल्ये विकसित करावी लागतील. शेवटी काय तर, यशस्वी समायोजन हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे हे म्हटल्यास काही वावगे ठरणार नाही. 




संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य




Tuesday, 5 October 2021

मन:स्वास्थ्य म्हणजे काय ?

       मन व शरीर एकमेकांना पूरक आहेत. मन स्वस्थ असेल तर व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवरही मात करू शकते. परंतु सध्याच्या स्पर्धात्मक, धकाधकीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष झाल्याने वेगवेगळे मानसिक आजार बळावत आहेत. शिवाय समाज मनोरुग्णांकडे आणि मानसिक आजारांकडे कलंकित नजरेने पाहतो. हा कलंक पुसून काढण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्‍टोबर हा दिवस "जागतिक मानसिक आरोग्य दिन' तसेच 4 ऑक्‍टोबर ते 10 ऑक्‍टोबर "जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात मन:स्वास्थ्याविषयी थोडेसे....

       शारीरिक आरोग्याबाबत आपण नेहमीच जागरूक असतो. शासन स्तरावरदेखील शरीर स्वास्थ्यविषयक प्रश्नांना जास्त महत्व दिले जाते. मानसिक स्वास्थ्याबाबत मात्र इतकी जाणीव समाजमनापर्यंत असलेली आढळत नाही. उच्च शिक्षित लोकांमध्येही ही जाणीव फार कमी प्रमाणात असल्याचे दिसून येते. जाणीव असली तरी मानसिक स्वास्थ्याबाबत अनेक गैरसमज आढळतात. शारीरिक स्वास्थ्य बिघडले तर ते ग्राह्य आहे. परंतु एखादी व्यक्ती तऱ्हेवाईक किंवा अपेक्षित वर्तनापेक्षा/नेहमीपेक्षा वेगळी वागत असेल तर त्याला लगेच मनोरुग्ण, वेडा असे शब्दप्रयोग वापरले जातात. खरं तर ही समजूत कितपत बरोबर आहे? मानसिक स्वास्थ्य बिघडणे म्हणजे त्याला मानसिक आजार/विकृती आहे असे मानता येणार नाही. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आढळतात की, जे क्षुल्लक गोष्टीवरून लक्षणीय चिडतात, कारणे सांगून जबाबदारी टाळणारे असतात, इतरांच्या कामात चुका दाखवणाऱ्या, आपल्या मागण्यांसाठी हट्ट धरून बसतात. मग या सर्वांनाच मनोविकृती किंवा सर्वांचेच मानसिक स्वास्थ्य हरवले आहे असे म्हणता येणार नाही. कारण स्वस्थ मन आणि अस्वस्थ मन यातील सीमारेषा स्पष्ट करता येत नाही. 

        फक्त शरीराचे आरोग्य चांगले असणे आणि शारीरिक रोगापासून वंचित असणे म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य किंवा रोगाचा अभाव या संकल्पनेमध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक पैलूंचा समावेश होतो. जी व्यक्ती या सर्व पैलूंनी संपन्न आहे, तिला स्वस्थ व्यक्तीमत्वाची व्यक्ती असे म्हणता येईल. स्वस्थ व्यक्तीमत्वाद्वारे  सर्वांगीण विकास साधण्यासाठी मानसिक दृष्टया स्वस्थ असणे आवश्यक आहे. मन आणि शरीर या दोन घटकांची यात महत्वाची भूमिका आहे. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही परस्पर पूरक आहेत. या दोहोंमधील क्रिया जोपर्यंत परस्परपूरक असतात तोपर्यंत व्यक्ती स्वस्थ असते. या दोन्हीत असंतुलन निर्माण झाला की अस्वस्थ मन निरोगी शरीरालादेखील रोगट करून टाकते. त्यामुळे मन जर स्वस्थ असेल तर शरीरदेखील तंदुरुस्त राहते. 

       या वरील विवेचनावरून आता मन:स्वाथ्य म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊयात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या व्याख्येनुसार, "मानसिक अनारोग्याचा अभाव, उत्पादकता, धनात्मक अभिवृत्ती आणि समायोजनाची तयारी या गुणांनी युक्त असे वर्तन म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय." वरील व्याख्येचा विचार केल्यास स्वास्थ्य म्हणजे केवळ रोगाचा अभाव नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टया स्वस्थ असणारी अवस्था. मानसिक स्वास्थ्य संपन्न असणाऱ्या व्यक्तीची काही वैशिष्टये. 

१. स्वतःला समाधानी ठेवू शकणे.

२. स्वतःच्या मर्यादा व उणीवा जाणणे. 

३. अपेक्षित यश मिळवू शकणे.

४. ज्ञान मिळवु शकणे. 

५. सामाजिक संबंधाची योग्य जाण असणे. 

६. सामाजिक समायोजन साधता येणे. 

७. मन:शांतीचा आंतरिक आनंद मिळवू शकणे. 

८. निवडलेल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करत राहणे. 

९. मानसिक तोल ढासळू न देता वास्तवता स्वीकारून परिस्थितीला तोंड देणे.

१०. व्यक्तिगत, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडणे. 

      आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक बाजू एकत्र करून एकमेकांशी गुंफण घालतो तेंव्हाच आयुष्यातले यश, अपयश, ताणतणाव, आनंद, दुःख, निराशा इत्यादी सर्व चढउतार आपण यशस्वीरीत्या, तार्किकरित्या पार पाडू शकतो. मनाची बौद्धिक व भावनिक बाजू, त्याचे हित व कल्याण ही मानसिक स्वास्थ्याची महत्वाची बाजू आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात चिंता, ताणतणाव, संघर्ष यामुळे मानसिक व्याधींचे प्रमाण वाढत आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य जपण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर उभे आहे. एकंदरीत आयुष्यातील संघर्षांवर व समस्यांवर यशस्वीपणे मात करून तसेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आयुष्याची प्रगती कायम राखून सुखासमाधानाने जगणे म्हणजे मानसिक स्वास्थ्य होय. 


संदर्भ : य.च.म.मु.वि. मानसिक स्वास्थ्य

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...