Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Monday, 20 September 2021

जागतिक अल्झायमर दिन विशेष

 


अल्झायमर या आजाराविषयी भारतीय समाजात एक प्रकारचा टॅबू आहे. लोक गैरसमज करून घेतील, या भीतीने आपल्याला किंवा आपल्या कुटुंबापैकी कुणाला हा आजार आहे, हे सहसा कुणी सांगत नाही. अशा लपवून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपलंचं मोठं नुकसान होतं.

       हा वृद्धांना होणारा आजार आहे. या आजारावर खुलेपणाने बोलल्यास त्याविषयीची जागृती निर्माण होऊन त्या दिशेने पावलं उचलली जातील, असं प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि ज्येष्ठ तसंच डिमेंशिया रुग्णांसाठी सिल्व्हर इनिंग नावाच्या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक डॉ. शैलेश मिश्रा यांचं म्हणणं आहे.

डॉ. शैलेश मिश्रा म्हणतात, "संपूर्ण जगातच उपचाराची योग्य पद्धत काय आहे तर सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचं निदान करावं. पण आपल्याकडे काय होतं, या आजाराला एक स्टिग्मा आहे. लोक वेडे म्हणतील, म्हणून ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय कुणालाही याबद्दल सांगत नाहीत आणि डॉक्टरांकडेही जात नाहीत."

ते पुढे म्हणतात, "अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, तेजी बच्चन यांसारख्या अनेकांना अल्झायमर होता. मात्र, इतरही अनेक जणांना हा आजार असूनही ते सार्वजनिक पातळीवर मान्य केलं जात नाही किंवा त्याबद्दल सांगितलं जात नाही. "

अल्झायमर म्हणजे काय?

या आजाराविषयी थोडं जाणून घेऊया. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर होतो. अल्झायमर हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. मराठीतत याला स्मृतीभ्रंश म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर विसरभोळेपणा.

1906 साली डॉक्टर अल्झायमर यांनी सर्वात आधी या आजाराविषयी सांगितलं. त्यामुळे याला अल्झायमर असं नाव देण्यात आलं.

बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो.

उदाहरणार्थ अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्‌ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.

मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.


का होतो अल्झायमर ?

अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.

वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.

समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.

हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

ब-जीवनसत्त्वाची कमतरता : डॉक्टर सांगतात भारतात बहुतांश शाकाहारी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.


अल्झायमर चे टप्पे

अल्झायमर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला 10-15 वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं.

या आजाराविषयी सांगताना डॉक्टर सागर मुंदडा सांगतात, "अल्झायमरमध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो."

या आजाराच्याही काही स्टेजेस असतात. या स्टेजसविषयी अधिक माहिती देताना डॉ. सागर सांगतात, "आजाराच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये रुग्णाला नुकत्याच घडून गेलेल्या गोष्टी आठवायला त्रास होतो. उदाहरणार्थ सकाळी काय खाल्लं हे दुपारी आठवत नाही. ही सुरुवातीची स्टेज मानली जाते."

मात्र, काही रुग्णांमध्ये याआधीही काही लक्षणं दिसतात. विनाकारण चिडचिडण होणे, गाढ आणि शांत झोप न लागणे, कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतीविचार करणे हीदेखील अल्झायमर किंवा डिमेंशियाची अतिशय सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र, ही प्रत्येकच रुग्णामध्ये दिसतीलच असं नाही.

यापुढच्या स्टेजेसविषयी डॉ. सागर सांगतात, "आजाराची पुढची स्टेज असते ज्यात क्रमाने कराव्या लागणाऱ्या गोष्टी करण्यात रुग्णाला अडचणी येतात. उदाहरणार्थ भाजी करायची असेल. तर ती कुठल्या क्रमाने करायची, हे रुग्णाला आठवत नाही.

गाडी चालवणे, कपडे घालणे यासारख्या गोष्टी ज्यात एकानंतर दुसरी क्रिया एका विशिष्ट क्रमाने कराव्या लागतात, त्या त्यांना जमत नाही. या पुढचा टप्पा म्हणजे रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हेसुद्धा लक्षात राहत नाही."

डिमेंशियाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णाची चिडचिड वाढते, तो कपडे घालायला विसरतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो. म्हणजे घरचा पत्ता आठवत नाही, त्यामुळे एकट्याने घराबाहेर पडता येत नाही. आंघोळ कशी करायची, आधी साबण लावायचा की पाणी हेही विसरतो. त्यामुळे आंघोळ घालावी लागते. आता टॉयलेटला जायचं आहे, याची सूचना मेंदूकडून मिळत नाही. त्यामुळे कुठेही सू-शी होते. अशावेळी डायपर वापरावे लागतात.

स्मृतीभ्रंशाच्या या स्टेजेस असल्या तरी याच क्रमाने प्रत्येक रुग्णाला त्रास होतो, असं नाही. अनेक रुग्ण कित्येक वर्ष पहिल्या स्टेजमध्येच असतात. तर काही रुग्णांमध्ये चार महिन्यातच त्रास वाढतो.


डॉक्टरांकडे कधी जायचं ?

याआधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप करायला हवं. यात लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी. मात्र, काही गोष्टी अशा आहेत की ज्या जाणवल्यावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे.

लहान-लहान गोष्टींचा विसर पडत असेल. उदाहरणार्थ 1000 लिहिताना एकावर किती शून्य लिहायचे ते विसरणे. लोकांची नावं विसरणे. कुलुपाची नेमकी किल्ली कोणती, ते विसरणे, गाडीची चाबी फ्रिजमध्ये ठेवणे.

कारण नसताना सारखी चिडचिड होत असेल.

कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटता नैराश्य येत असेल. कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल.

अशी काही लक्षणं असल्यावर डॉक्टरांची मदत नक्की घ्यावी. यापैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं असल्यावर तो डिमेंशिया किंवा अल्झायमर असेलच असं नाही.

कदाचित काही मानसिक ताण किंवा इतरही आजार असू शकतात. मात्र, त्याच योग्य निदान डॉक्टरांकडे गेल्यावरच होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट क्षुल्लक आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही.


अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी

अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.

व्यक्ती जेव्हा लहान-लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबीयांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचीही चिडचिड वाढते. त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं.

तुम्ही आता काही कामाचे नाहीत, एकच गोष्ट कशी वारंवार सांगावी लागते, असं म्हटल्याने रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असतं. अशा रुग्णांचा तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.


अल्झायमर ग्रस्त रुग्ण आणि कुटुंब

आजारपण म्हटलं की रुग्णाबरोबरच त्याच्या कुटुंबालाही त्याचा त्रास होतो. मात्र, अल्झायमर या आजारात रुग्णापेक्षा कुटुंबीयांना जास्त त्रास होतो. अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. पण, कपडे घालायला विसरणे, कुठेही नैसर्गिक विधी करणे, वस्तू जागेवर न ठेवणे या सगळ्या गोष्टींचा त्याच्या कुटुंबीयांना अतिशय त्रास होत असतो. रुग्णाची चिडचिड वाढते. अशावेळी कुटुंबीयांचा संयम संपतो.

डॉ. मिश्रा म्हणतात, "पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. शहरातली घरं छोटी झाली आहेत. अशावेळी घरात एखादा अल्झायमर झालेली व्यक्ती असेल तर तिचा सांभाळ करणं फार अवघड होतं."

दुसरं म्हणजे हा खूप खर्चिक आजार आहे. डिमेंशियाच्या रुग्णांना सारखे डायपर वापरावे लागतात. वृद्धांचे डायपर महाग असतात. शिवाय, घरात सगळे कामावर जाणारे लोक असतील तर रुग्णासाठी केअर टेकर ठेवावा लागतो, त्याला 8 तासांचे 700 ते 800 रुपये मोजावे लागतात. म्हणजे अशा रुग्णांसाठी महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांचा खर्च येतो.

शिवाय, डिमेंशियाच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणाव्यतिरिक्त इतर कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच असतात. ही सगळी परिस्थिती कुठल्याही कुटुंबासाठी कष्टप्रद असते.


रुग्णाची काळजी

डिमेंशिया किंवा अल्झायमरच्या रुग्णांना प्रेम आणि जिव्हाळा अत्यंत महत्त्‌वाचा असतो. याशिवाय संगीत, नृत्य, चेअर योगा, छंद अशा वेगवेगळ्या मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीज फार महत्त्वाच्या असतात.

डिमेंशिया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत त्यासाठीचं काम झालेलं नाही, अशी खंत डॉ. मिश्रा व्यक्त करतात. ते म्हणतात, "या आजारासाठी सरकारी पातळीवर म्हणावे तितके प्रयत्न झालेले नाही. महाराष्ट्रात सरकार मेमरी क्लिनिक सुरू करणार होते. पण ते काम कितपत झालं, याची काहीही माहिती नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये मेमरी क्लिनिक हवं. आरोग्य सेवकांना विशेष प्रशिक्षण हवं."

डॉ. मिश्रा म्हणतात, "डिमेंशियाच्या रुग्णांची संख्या बघता राष्ट्रीय डिमेंशिया धोरणाची गरज आहे. याअंतर्गत प्रत्येक वॉर्डात डिमेंशिया डे-केअर असायला हवं. लहान मुलांना जसं आई-वडील दिवसभर डे-केअरमध्ये ठेवून आपापल्या कामावर जातात. तसेच सेंटर्स डिमेंशिया रुग्णांसाठी हवे.

दुसऱ्या आणि त्यापुढच्या टप्प्यातल्या रुग्णांसाठी असिस्टेड लिव्हिंग केअर होम्स हवेत. जिथे रुग्णांची 24 तास काळजी घेतली जाईल. त्यानंतर होम केअर सर्व्हिस हवी. यात डिमेंशिया आजाराच्या दृष्टीने प्रशिक्षित आरोग्य सेवक हवे त्या वेळेला घरी येऊन रुग्णांची तपासणी करू शकतात."

भारतात आज घडीला केवळ दहा डिमेंशिया केअर होम्स आहेत.

याशिवाय केअर गिव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी एक दीर्घकालीन योजना सरकारने आखायला हवी. इतकंच नाही तर मेडिकल कॉलेजसमध्ये डॉक्टर आणि नर्सेसना डिमेंशिया उपचारासंबंधीचं प्रशिक्षण देणंही गरजेचं असल्याचं डॉ. मिश्रा यांचं म्हणणं आहे.

ते म्हणतात, "भारतात डिमेंशिया एमडी डॉक्टर नाहीत. म्हणजेच भारतात डिमेंशिया स्पेशलिस्ट नाहीत. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात डिमेंशिया आजार हा अभ्यासक्रमाचा खूप छोटा भाग आहे. मानसोपचारामध्ये एमडी करणाऱ्या डॉक्टरांनाच या विषयाची सविस्तर माहिती अभ्यासक्रमात असते. या सगळ्यामधून एक चांगलं वातावरण तयार होईल."


प्रतिबंधात्मक उपाय

डिमेंशिया कधीही होऊ नये, यासाठी खात्रीशीर उपाय नाही. मात्र, जीवनशैलीमध्ये काही बदल करून हा आजार दूर ठेवता येतो.

हृदय निरोगी ठेवा

चांगली झोप घ्या

जीवनशैली उत्तम ठेवा

रोज किमान 30 मिनिटं योगा, व्यायाम, सायकलिंग, रनिंग असा एकतरी व्यायाम प्रकार करा

दारू, सिगारेट, तंबाखू, अशी व्यसनं टाळा

मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला गुंतवा.

सकस आणि ताजं अन्न खा. साखर, मीठ यांचा आहारात कमी प्रमाणात समावेश करा.

डॉ. मिश्रा सांगतात, "एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा म्हातारपणात होणारा आजार असला तरी त्याची सुरुवात 40 ते 50 व्या वर्षापासून होते. माझं वय 40 ते 50 च्या घरात असेल आणि मी खूप व्यसनं करत असेन, सतत पिझ्झा, बर्गर खात असेन, पुरेशी झोप घेत नसेन किंवा दिवसातला रिकामा वेळ मिनिंगफुल अॅक्टिव्हिटीमध्ये न घालवता तासनतास टिव्ही किंवा मोबाईलसमोर बसत असेन तर अशा प्रकारचे त्रास होणार, हे निश्चित."

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तर 40-50 वर्षांच्या लोकांमध्येही हे आजार दिसू लागले आहेत. त्यामुळे आपणही यातून शिकवण घेऊन घरात कुणाला विसरभोळेपणा आहे, याची लाज वाटून न घेता त्यावर उपचार घेतले पाहिजे.


डिमेंशिया किंवा अल्झायमर झालेली व्यक्ती स्वतः सगळं विसरत असते. त्यामुळे तिच्या काहीच लक्षात राहत नाही. अशावेळी तुम्ही तिच्यावर योग्य उपचार केले नाही तर तो आपल्या प्रिय व्यक्तीवर अत्याचार ठऱत असतो.


- नूतन कुलकर्णी
बीबीसी मराठी
bbc.com

Wednesday, 15 September 2021

कशी येते मॅच्युरिटी ?


"परिपक्व व्यक्तिमत्व"


१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


२) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


३) माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


४) प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.


५) प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


६) माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


७) माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


८) माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो, तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


९) माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


१०) माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.


*११) माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.*


*१२) माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे !*

             

(कॉपी पेस्ट)

Saturday, 4 September 2021

उन्माद

या मानसिक विकृतीचे विविध प्रकार असून ते मज्‍जाविकृतीच्या सदरात पडतात कारण चित्तविकृतींच्या बाबतीत आढळून येणारे व्यक्तिमत्त्वाचे गंभीर विघटन या विकृतीच्या बाबतीत झालेले नसते. इंग्रजीत ह्या विकृतीस ‘हिस्टेरिया’ म्हणतात. प्राचीन ग्रीक वैद्य हिपॉक्राटीझ याची अशी समजूत होती, की तरुण स्त्रियांच्या अतृप्त गर्भाशयाचे (हिस्टेरा = गर्भाशय) ऊर्ध्व दिशेने चलनवलन होऊ लागल्यामुळे या विकृतीची लक्षणे उद्‍‍भवतात. ही कल्पना अर्थातच चुकीची ठरली आहे कारण लहान मुलांमध्ये, पौगंडावस्थेतील किशोरांमध्ये, त्याचप्रमाणे सैनिक, लेखनिक, तारखात्यातील संदेशप्रेषक वगैरे व्यक्तींमध्येही या विकृतीची काही लक्षणे आढळलेली आहेत. तथापि ‘हिस्टेरिया’ ही आता अन्वर्थक नसलेली संज्ञाच या विकृतीस रूढ होऊन बसली आहे.


लक्षणे व प्रकार : या विकृतीच्या लक्षणांच्या मुळाशी प्रत्यक्ष शारीरिक-इंद्रियांतील स्‍नायूंमधील वा केंद्रीय मज्‍जासंस्थेतील बिघाड नसतो परंतु रुग्णाच्या इंद्रियांची, कर्मेंद्रियांची, तसेच प्रत्यभिज्ञा, स्मृती वगैरे मनोव्यापारांसंबंधीची विक्रिया अथवा अक्षमता तीत निर्माण होते. त्यामुळे ही कार्यिक अक्षमता म्हणजे केवळ ढोंग वा कामचुकारपणाने केलेली बतावणी होय, असे लोकांना वाटण्याचा संभव असतो. परंतु असे समजणे बरोबर नाही कारण या अक्षमतेपायी व्यक्ती सुखाला पारखी होत असते इतकेच नव्हे, तर काही लक्षणे इतकी गंभीर असतात, की त्यापायी व्यक्तीच्या जिवास अपाय होण्याचाही संभव असतो.


या विकृतीच्या लक्षणांचे (१) कारक इंद्रियांशी संबंधित, (२) वेदनेंद्रियांशी संबंधित, (३) अंतस्थ इंद्रियांशी संबंधित आणि (४) मनोव्यापारांशी संबंधित असे प्रकार पडतात. हातापायांचा वा इतर स्‍नायूंचा लुळेपणा, स्‍नायुकंप, वांब येणे, सांधे जखडणे, स्वरयंत्राची अक्षमता, खुदूखुदू हसल्यासारखी शरीर चेष्टा होणे ही कारकइंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.


त्वचेच्या विशिष्ट भागापुरतीच आग, कधी या तर कधी दुसऱ्याच एखाद्या भागाची स्पर्शबधिरता, अचानक झिणझिण्या, डोळे किंवा कान अगदी सुस्थितीत असूनही पूर्ण किंवा निवडक गोष्टींपुरतेच अंधत्व किंवा बहिरेपण, स्वतःच्या हालचालींचे वेदनच लुप्त होणे, डोकेदुखी तसेच पाठदुखी ही वेदनेंद्रियांशी संबंधित लक्षणे होत.


अंतस्थ इंद्रियांबाबतच्या लक्षणांमध्ये समाविष्ट होणारी या विकृतीची लक्षणे म्हणजे अन्न घशाखाली न उतरणे, श्वासनलिकेची विक्रिया होऊन श्वास घेण्यास त्रास वाटणे, खोकल्याची उबळ, गुदमरल्यागत वा गळा भरून आल्यागत अवस्था, वांतीची भावना, बद्धकोष्ठ, हृदयाची धडधड, हृदयाच्या वरच्या बाजूस छातीत दुखणे गर्भारपणाची भावना (वंध्या स्त्रियांना) वगैरे होत.


उन्माद विकृतीच्या मनोव्यापारांच्या पातळीवरील लक्षणांमध्ये स्मृतिलोप, निद्राभ्रमण, तंद्रावस्था, आपण कोण व कुठचे आहोत, हेच विसरून जाऊन आत्मविस्मृतिपूर्वक भ्रमण व व्यवहार, मूर्च्छा वगैरेंचा समावेश होतो. ही मूर्च्छा फक्त जागेपणीच व साधारणतः इतरांच्या उपस्थितीत येते. स्वतःस इजा न होईल अशा बेताने व्यक्ती जमिनीवर पडते, दातखीळ वा तोंडास फेस नसतो. या अवस्थेत होणाऱ्या हालचाली म्हणजे एक प्रकारचे नाट्य असते व या मूर्च्छेनंतर, अपस्माराच्या झटक्यानंतर येतो तसा थकवा न येता, उलट मोकळे वाटते. एकाच शरीरात दोन वा अधिक मने वा व्यक्ती, अथवा दुहेरी व्यक्तिमत्त्व तसेच व्यक्तिमत्त्व बाहुल्य हेही याच विकृतीचे अत्यंत नेत्रवेधक व नाट्यपूर्ण प्रकार होत.


उन्मादाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व साधारणतः पुढीलप्रमाणे असल्याचे आढळते : त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये संयम कमी असतो व लहान मुलांप्रमाणे त्या प्रतिक्रिया अपरिपक्‍वतेच्या निदर्शक असतात. आप्त व मित्र यांबाबत त्यांची वागणूक लहरी कधी खूप प्रेमाची तर कधी द्वेषपूर्ण असते. इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावे व आपले कौतुक करावे, सहानुभूती दर्शवावी, अशी त्यांची अपेक्षा असते. संघर्षजनक समस्या जबाबदाऱ्या टाळण्याकडे तसेच त्या दुसऱ्यावर ढकलण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते. त्यांच्या भावनिक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा व इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये हिकमतीपणा व नाटकीपणा असतो. या व्यक्ती खूप सूचनक्षम असतात. त्यांना चिंताकुलतेचे अधूनमधून झटके येत असतात.


कारणमीमांसा: या विकृतीची लक्षणे शारीरिक दोषमूलक नसतात. काही काही लक्षणे सूचनवशतेमुळे निर्माण होतात, असे बॅबिन्स्की याने दाखवून दिले आहे. प्येअर झाने (१२५९–१९४७) याच्या मते ही विकृती म्हणजे मानसिक अवसन्नतेचाच एक प्रकार होय. त्याची उपपत्ती अशी आहे : (अ) काही व्यक्तींमध्ये आनुवंशिक कारणांमुळे मानसिक शक्तीची कमतरता असते. (ब) त्यातच मनोभावात्मक आघांताची किंवा ताणांची भर पडल्यामुळे, अशा व्यक्तींच्या मानसिक जीवनाचे संश्लेषण व्हावे तसे होत नसते. (क) अशा स्थितीत जर तीव्र मानसिक आघात करणाऱ्या अथवा मनःशक्तीचा अतोनात व्यय करणाऱ्या घटना घडल्या तर त्या घटना जाणिवेच्या प्रवाहात सामावून घेतल्या जाण्याऐवजी संपूर्णपणे किंवा अंशतः विलग म्हणजे वियुक्त राहतात. या वियोजन प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या अंतरंगात जणू एक निराळी संघटना बनते व व्यक्तिमत्त्वात कार्यात्मक एकात्मता येत नाही. व्यक्तिमत्त्वाचा असा विलग राहिलेला भाग स्वतंत्र रीत्या कार्य करू लागतो व प्रसंगविशेषी या विकृतीच्या लक्षणांच्या रूपाने डोकावतो.


परंतु हे वियोजन का घडून येते ? झाने याच्या उपपत्तीत या प्रश्नाचे उत्तर नाही ते सिग्मंड फ्रॉइड (१२५६–१९३९) याने देण्याचा प्रयत्‍न केला.त्याची उपपत्ती अशी : व्यक्तीच्या अप्रशस्त प्रेरणा व वासना, तिच्या भावजीवनात दुःखदायक वा लज्‍जास्पद खळबळ उत्पन्न केलेल्या प्रसंगांच्या स्मृती इत्यादींचा व्यक्तीच्या ‘अहं’शी संघर्ष होतो व अहंकडून अर्धवट दडपल्या गेलेल्या व निराळी संघटना करून राहिलेल्या प्रेरणा, वासना व स्मृती नानाविध लक्षणांची रूपे घेतात व बोधमनात डोकावू लागतात. अर्थात त्यांचे ‘रूपांतरण’ झालेले असते. या दृष्टीने पहाता, ही विकृतिलक्षणे प्रयोजनगर्भ व अर्थपूर्ण असतात.


उन्माद विकृतीच्या कोणत्या लक्षणांचा अवलंब व्यक्तीकडून होईल हे दोन गोष्टींवर अवलंबून असते : (१) व्यक्तीचा स्वतःचा पूर्वानुभव आणि (२) इतरांचे तिच्या नजरेस पडलेले वर्तन. स्वतःला हवे असणारे कौतुक व सहानुभूती मिळवायला अथवा नको असलेले भावनाक्षोभक प्रसंग टाळायला अमुक अमुक प्रकारची शारीरिक तक्रार अथवा अमुक प्रकारची अवस्था उपयोगी पडेल, हे तिने लहानपणाच्या स्वानुभवांवरून तसेच इतरांचे वर्तन पाहून हेरलेले असते व मग स्वयंसूचनेद्वारा ती ती लक्षणे त्या त्या व्यक्तीत दृग्गोचर होऊ लागतात.


चिकित्सा: ही विकृती दूर होऊ शकते. रुग्णाचा मंत्रतंत्रादींवर विश्वास असला, तर त्याच्या सूचनवशतेचा फायदा घेऊन मंत्रतंत्रादींचा उपयोग करता येतो. काहीतरी औषध देणे वा दिल्यासारखे करणे तसेच वेळप्रसंगी शस्त्रक्रियेचे नाटक करणे म्हणजे अप्रत्यक्ष सूचनतंत्र वापरणे हेही उपयोगी पडू शकते. प्रत्यक्ष सूचनांचाही उपयोग होतो. संमोहनपूर्वक सूचनांचाही उपयोग होतो तथापि केवळ सूचनोपचार हा चिरपरिणामी ठरत नाही. कारण जोवर स्वतःच्या विकृतीचे अबोध मनात असलेले मूळ रुग्णाच्या बोध मनात आणले जात नाही तोवर त्याची विकृती या नाहीतर दुसऱ्या कोणत्यातरी लक्षणांच्या रूपाने शिल्लकच राहते. काहींच्या मते इतर कोणत्याही उपायांनी न सुधारणाऱ्या रुग्णांच्या बाबतीतच सूचनतंत्र वापरावे, एरव्ही वापरू नये कारण हे रुग्ण आधीच सूचनक्षम असतात व सूचनतंत्राने ते अधिकच सूचनक्षम होण्याचा संभव असतो.


रोग्याच्या मनातील (त्याची त्यालाच जाणीव नसलेलेही) काढून घेणे हा चिकित्सेचा उत्तम मार्ग होय. त्यासाठी त्याला संमोहित करून (हिप्‍नोअनॅलिसिस) किंवा औषध देऊन (नार्कोअनॅलिसिस) अथवा जागृत अवस्थेत मुक्तपणेबोलावयास लावून (सायकोअनॅलिसिस) आणि त्याबरोबरच त्याच्या स्वप्नांचा अन्वयार्थ लावून विश्लेषण करता येते. यांपैकी शेवटचा मार्ग श्रेयस्कर ठरतो कारण त्यायोगे रुग्णाचे मनोविरेचन होते व शिवाय स्वतःच्या विकृतीच्या मुळाशी असलेले संघर्षप्रसंग रुग्णाचे रुग्णालाच समजू लागतात. मात्र मनोविश्लेषण बरोबरच रुग्णाच्या ठिकाणी मानसिक परिपक्‍वता आणणे, त्याची स्वतःकडे व इतरांकडे पाहण्याची दृष्टी सुधारणे, त्याच्या सवयींत व अभिवृत्तींत बदल घडवून आणणे, हेही आवश्यक असते. यांशिवाय रुग्णाशी संबंधित असलेल्या व्यक्तींतही बदल घडवून आणणे पुष्कळदा आवश्यक असते.


अकोलकर, व. वि.

मराठी विश्वकोश

Thursday, 2 September 2021

माणूस “मागे” असण्याची २३ कारणे


1. कमी प्रवास - 

प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक स्थितीमुळे फारसा प्रवास करताना दिसत नाही, अनेक औद्योगिक प्रदर्शनात मराठी माणूस दिसत नाही.


2. अति राजकारण -

सर्वतजास्त मराठी माणूस राजकारण वेडा आहे. राजकीय नेत्यांच्या सभेला आपला कामधंदा सोडून लाखोंच्या संख्येने येणारा मराठी माणूसच असतो. यात व्यापारी समाजातला एक तरी माणूस दिसतो का? मी काय करतो आहे या पेक्षा लोकांनी काय केले, काय करतात यात जास्त लक्ष.


3. दोनच हात कमावणारे -

सर्वसाधारण मराठी कुटुंबात एकच व्यक्ती कमवते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोकांनी काम केले पाहिजे.


4. सर्वांची तोंडे वेगळ्या दिशेला –

कुटुंबात एकी नसते. बाप एका दिशेला, मोठा मुलगा एका दिशेला तर लहान भाऊ तिसरीकडेच. प्रत्येक कुटूंबात एकी पाहिजे.


५)  खोटं बोल पण रेटून बोल –

सगळ्या थापा एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी, खरे सांगण्यासारखे नसतेच म्हणून खोट बोलावे लागते. मी हे करीन ते करीन या स्वप्नातच आयुष्य संपते, पण मी हे करतोच असा निश्चय घेत नाहीत.


६) आहार व आरोग्याकडे दुर्लक्ष –

आरोग्याकडे अत्यंत दुर्लक्ष, महागाईमुळे उपचारही परवडत नाही, थातुरमातुर उपचार केले जातात. योग्य आहार नाही, व्यसनांचे प्रमाण प्रचंड आहे. भरपूर पैसा व्यसनातच संपतो.


७) आर्थिक निरक्षरता –

पैसा काय आहे ? तो कसा वापरायचा ? शेअरमार्केट, डिमॅट, फॉरेन एक्सचेंज, डॉलर, आय टी याची खूप कमी माहिती शिकलेल्या लोकांनाही नाही. ९०% महिलांचे तर साधे पॅनकार्ड सुद्धा नसते.


८) दूरदृष्टीचा अभाव –

पुढील ५, १०, २० वर्षाच्या योजना आखाव्या लागतात. त्यावर आजपासूनच काम करावे लागते. अशा दूरदृष्टीमुळे नियोजन होते व माणसे कामाला लागतात.


९) ऐतिहासिक स्वप्नात –

अजूनही मराठी माणूस ऐतिहासिक स्वप्नात जगत आहे. जास्तीजास्त वेळ फेसबुक व्हाट्सएप वर कोणी कधी काय केले ते शोधत फिरतो, आणि स्वतःचा वेळ वाया घालवतो, तेव्हा सत्य आणि सध्याच्या परिस्थितीचे भान ठेऊन उद्योग करून पैसा कमावला पाहिजे.


१०) गृहकलह, कोर्टकचेरी –

गृहकलहाचे प्रमाणही प्रचंड आहे. भावाभावातचं वाद. संपत्तीवरून भावकीत वाद , वादावादी, मारामारी, खून, कोर्टकचेऱ्या सामंजस्यपणे निपटावे व प्रगतीच्या मार्गे लागावे.


११) समाज अर्थपुरवठा पद्धत –  

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अत्यंत कमी व्याज दरात किंवा बिनव्याजी ताबडतोब अर्थपुरवठा करण्याची व समाजातील सर्वाना वरती आणण्याची पद्धत गुजराती, सिंधी, समाजात आहे. तशी मराठी समाजात आढळत नाही.

आता तर सरकार ने नवीन व्यावसायिकांसाठी 5 लाखांपर्यंत कर्जयोजना सूरु केली आहे, ज्यात बिना गैरेंटी कर्ज उपलब्ध आहे, पण त्याबद्दल काहीच माहिती करून घेत नाहीत.


१२) जनरेशन गॅप –

खूप मोठा जनरेशन गॅप कुटुंबात जाणवतो. एखादा हुशार तरुण उद्योग करतो म्हटले कि त्यालाच येड्यात काढले जाते. जुन्या लोकांच्या डोक्यातून नोकरी अजून जात नाही.


१३) ज्ञानापेक्षा सर्टिफिकेट –

प्रत्यक्ष व प्रॅक्टिकल ज्ञानापेक्षा पदवीच्या सर्टिफिकेटला जास्त महत्व आहे. काहीही करून पदवी मिळवायची. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर झाले बेरोजगार…. व बाहेरून आलेला प्लंबर, गवंड्यांचे काम करून महिना ५० हजार कमवतो.


१४) धरसोड वृत्ती –

हे प्रमाण प्रचंड आहे. थोडे दिवस खासजी संस्थेत नोकरी… कामाच्या अगोदरचं पगार किती देणार ? विचारायची प्रवृत्ती…हे काम केले तर लोकं काय म्हणतील??? अशा धरसोड वृत्तीमुळेच आयुष्यातील १० वर्ष निघून जातात. एकदाच ठसून एखाद्या क्षेत्रात टिकून राहिले पाहिजे.


१५) कष्टाची लाज –

विशेषतः सुशिक्षित तरुणांना कष्टाची लाज वाटते. Easy Money चे खुळ डोस्क्यात थैमान घालतयं. मी एमए, बीई, बीएड, झालोय म्हणजे मला इस्त्रीचे कपडे घालून फिरण्याचा अधिकार आहे असे समजतात. स्वतःच्याच घरातही कामं करण्यास लाजं वाटते.


१६) फालतू बाबींना महत्व –

एकत्र येणे, प्रगती साधणे, उद्योग उभारणे हे मुख्य विषय राहिले बाजूला… पण मराठी माणूस अजून लग्नपत्रिकेत नाव नाही टाकले, लग्नात आहेर नाही केला, होर्डिंग ववर नाव माही टाकले, अशा फालतू बाबींमध्ये अडकला आहे.


१७) दुसऱ्यांच्याच अपयशात आनंद –

भावाचा ऊस जळाला, त्याला पाण्याची नाही दिली, त्याची म्हैस गेली कि दुसऱ्या भावाला भलताच आनंद व उकळ्या फुटतात…मित्रांचे व्यवसायात नुकसान झाले, बरं झालं मी आधीच सांगत होतो नको करू, अगदी आपल्या सख्ख्या भावाचं चांगले झाल्यावरही बघवत नाही हे “आश्चर्य”…!!! मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू आहे…!!!


१८) इंग्रजी कच्चे –

मराठीचा अभिमान जरूर बाळगावा पण जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व पुढे जाण्यासाठी अस्सलिखित इंग्रजी बोलणे, लिहिणे, वाचणे आलेच पाहिजे. अति उत्तम इंग्रजी आलेच पाहिजे. इंग्रजी बोलता येत नाही म्हणून इंग्रजीवर राग दाखवून काही होणार नाही.


१९)  संवाद कौशल्याचा अभ्यास –

जीवनात व उद्योगात पुढे जाण्यासाठी आपण दुसऱ्यांशी संवाद करतो ह्या कौशल्याचे खूप मोठे महत्त्व आहे. मोठे प्रोजेक्ट मिळवणे, काम मिळवणे, विविध स्थानिक अधिकारी वर्ग इतर व्यक्ती यांनाही आपण प्रत्यक्ष पत्रव्यवहार, इ-मेल द्वारे, फोनवर कसा उत्कृष्ट संवाद साधला पाहिजे हे शिकले पाहिजे.


२०) चाकोरी मोडत नाही –

अजूनही जुन्याच पद्धतीने काम चालू आहे. त्यामुळे प्रगती होत नाही, मतदार संघात काहीही काम न करता कित्येक दशके तोच खासदार, आमदार, नगरसेवक, झेडपी – पंचायत – ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्याचे / येण्याचे प्रकार दिसतात.

 त्या जागी नविन उत्साही चांगल्या ईमानदार व्यक्तीस निवडुन देऊन बदल करायला तयार होत नाहीत. छोट्याशा स्वार्था साठी गुलामी चमचेगीरी करायची वाईट सवय जात नाही.


२१) जाती प्रथा –

(फालतू प्रथा) 21व्या शतकात सुद्धा जाती प्रथेचा पगडा प्रचंड आहे. एकाच गावात व एकाच गल्लीत १० वेगवेगळ्या जातीचे पुढारी आहेत. संपूर्ण समाज अनेक धर्म – पंथ – जात – पोटजातीत विभागला गेला आहे, त्यामुळे समाजाची ताकद क्षीण झाली आहे. या धावपळीच्या युगात एक मराठी माणूस म्हणून कोणीच एकत्र यायला मागत नाही. आणि याचा फायदा इतरांना होतो.

अमुक एका जातीत जन्म झाला यासारख्या अर्थशून्य गोष्टींचा मराठी माणसाला; स्वतःची  एक व्यक्ती म्हणून दमडीची अचीव्हमेंट नसताना; चक्क अभिमान वाटतो.


२२) वेळेची किंमत –

वेळेचे महत्व समजलेले नाही. अनेक व्यक्ती आयुष्याच्या वेळेचा प्रचंड अपव्यय करताना दिसतात. बारसे, साखरपुडा, मुलगी बघणे, विवाह, यात्रा, मयत, प्रचार सभा, निवडणूक, वारी, देवदर्शन, राजकारण, या अनेक बाबींसाठी सरासरी वर्षातले १०० दिवसाहून अधिक काळ वाया घालवतात.


२३) ग्राहकाला किंमत न देणे - 

ग्राहक म्हणजे राजा समजला जातो पण अपल्याकडे तसे होत नाही, ग्राहकाला समोर रुबाब दाखवणे, तसेच ऐन कामाच्या वेळेला मोबाईल बंद करून ठेवणे आणि ग्राहकाला दिलेलं वेळ न पाळणे, 10 ची वेळ सांगून 11 ला पोचणे, याने ग्राहक सुद्धा निसटतो. आणि आपला रेफरन्स पुढे कोणाला देत नाही.

*प्रत्येकाने स्वत:च्या विचारसरणीत बदल करा*

*तरच तुमचे  भविष्य बदलेल*


(आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून)

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...