Welcome to the Blog of Department of Psychology at Kanya Mahavidyalaya, Miraj

Saturday, 29 January 2022

रोगप्रतिकारशक्ती कमी झाली.. कसं ओळखाल?

 संवाद हा आपल्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा घटक. कोणी आपल्याशी बोलायला नसलं, आपण एकटे असलो तरी संवाद थांबत नाही. आपण मनातल्या मनात आपल्या स्वत:शी संवाद साधत राहातो. संवादामुळे मन मोकळं होतं, ज्ञान मिळतं, असलेलं ज्ञान  इतरांपर्यंत पोहोचतं. रंजन-मनोरंजन होतं.  माहितीची देवाण घेवाण होते. जगण्यात संवाद नसता तर काय झालं असतं? आपण कसे जगलो असतो, याचा विचार देखील करवत नाही. इतका संवाद महत्त्वाचा आहे. पण म्हणून आपण संवादाकडे खरंच लक्ष देतो का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे आपलं आपल्या शरीराकडे. आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष. शरीराच्या आत विविध क्रिया सुरु असतात. त्या जाणवतही नाही इतक्या त्या सहज होतात. पण त्यात काही अडथळा आल्यास, काही बिघाड झाल्यास त्याची कुणकूण शरीराला लागते. शरीर आपल्याला आरोग्याबाबतीत काहीतरी बिघडलंय हे सांगण्याचा प्रयत्न विशिष्ट लक्षणांद्वारे करत असतं. पण शरीर आपल्याशी साधणाऱ्या संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आजारी पडतो. म्हणून तज्ज्ञ म्हणतात, की शरीर काहीतरी सांगत असतं, ते ऐकायला, समजून घ्यायला शिकलात तर निरोगी राहाण्याचा मार्ग सहज सापडतो.  आपण निरोगी आहोत, सशक्त आहोत  हे जसं आपलं शरीर सांगतं तसेच आपल्या आरोग्याचं रक्षण करणारी रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे देखील  शरीर आपल्याला सांगत असतं. याकडे जर दुर्लक्ष झालं तर आजारांपासून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकत नाही. 


    कोरोना संसर्गापासून आपल्याला रोगप्रतिकारशक्तीची आपल्या आरोग्य राखण्यातली भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळायला लागलं. विविध प्रकारच्या विषाणुंचा, घातक जिवाणुंचा संसर्ग होण्यापासून केवळ आपल्याकडील रोगप्रतिकारशक्तीच आपल्याला वाचवू शकते असं आरोग्यतज्ज्ञ सांगत आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे लक्ष देऊन आपली  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं आपण मनावर घ्यायला हवं. आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती  चांगली की ढासळलेली हे समजून घेण्यासाठी  कुठल्याही बाहेरच्या तपासण्यांची गरज नसते. आपलं शरीर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं विशिष्ट लक्षणांद्वारे सांगत असतं.  लक्षणांद्वारे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे ओळखता येतं. या लक्षणांकडे लक्ष देण्याची, ती वेळेत लक्षात घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून आपण आपल्या आरोग्याचं रक्षण करु शकतो. 


रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याची काही लक्षणे

1. सतत थकवा वाटणं

शारीरिक किंवा बौध्दिक कष्टाचं काम केल्यानंतर शरीराला, मेंदूला थकवा येतो. थोडासा आराम केला, काही खाल्ल्यास ऊर्जा येते.   झोपेतून उठल्यानंतर सकाळी छान वाटतं. ताजंतवानं वाटतं.  पण रात्री खूप वेळ झोपूनही सकाळी आपल्याला जर थकवा वाटत असेल, उत्साह वाटत नसेल , कष्टाचं काम न करताही थकल्यासारखं वाटत असेल, उठल्यानंतरही परत झोपावसं किंवा सुस्त वाटत असल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.  रोज व्यायाम केल्यास थकलेल्या शरीरला ऊर्जा मिळते. त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती वाढण्यावर होतो. पण व्यायाम करुनही थकवा जात नसेल, व्यायाम केल्यानंतरही थकवा जास्त वाटत असल्यास वैद्यकीयतज्ज्ञांचा सल्ला घेण्याइतपत आपली रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे हे समजावं.


2. टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला

प्रौढ व्यक्तींना वर्षातून दोनदा सर्दी पडसं होणं, खोकला होणं ही सामान्य बाब आहे असं तज्ज्ञ  म्हणतात. सर्दी  खोकला झाल्यावर त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीर औषधं घेण्याआधीच सज्ज होतं. सर्दी खोकल्याशी नैसर्गिक रित्या लढण्यासाठी आवश्यक ती प्रतिपिंडं ( ॲण्टिबाॅडीज)विकसित करण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागतात. 4-5 दिवसानंतर सर्दी खोकला औषधाशिवायही कमी व्हायला लागतो.  याचं कारण आपली रोगप्रतिकारशक्ती. पण तिच जर कमजोर असेल तर सर्दी खोकला 4-5 दिवसात आपोआप कमी न होता, तो वाढतो, आठवडा उलटून गेल्यावरही टिकून राहातो. दीर्घकाळ टिकून रहाणारी सर्दी आणि खोकला आपली रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याचं सांगते. 


3.  पोटाच्या पचनाच्या समस्या

पचनाचा थेट संबंध हा रोगप्रतिकारशक्तीशी असतो. एखाद्याचं पोट जर कायमच खराब असेल, पचनाशी निगडित समस्या जर एखाद्याला कायमच सतावत असतील तर तज्ज्ञांच्या मते अशी व्यक्ती कधीच निरोगी राहात नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ऊती आपल्या आतड्यात असतात.  वारंवार जुलाब होणं, आतड्यांना सूज येणं, बध्दकोष्ठतेचा त्रास कायम जाणवणं या पोटाशी, पचनाशी निगडित समस्या आपली रोगप्रतिकारशक्ती कमजोर असल्याचं सांगतात.


4. नेहमीपेक्षा जास्त तणाव घेणे

रोगप्रतीकारशक्ती कमी झालेली असल्यास छोट्याछोट्या गोष्टींचा ताण येतो, सोपी सहज कामं करताना चिडचिड होते. ताणतणाव जास्त झाल्यास , चिडचिड होत असल्यास  त्याचा परिणाम म्हणून रोगप्रतिकारशक्ती आणखी कमी होते. आपली रोगप्रतिकारशक्ती ही रक्तातील पांढऱ्या पेशी, लसिका ग्रंथी आणि शरीरातील प्रतिपिंडांवर अवलंबून असते.  मानसिक ताणतणावाचा परिणाम या तिन्ही गोष्टींवर होतो. म्हणून एरवीपेक्षा आपण जास्तच चिडचिड करतोय किंवा सततच्या तणावानं अस्वस्थ वाटत असल्यास आधी डाॅक्टरांकडे जावं. दुर्लक्ष केल्यास कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती आणखी कमकुवत होते. 


5. जखमा भरायला उशीर लागणे

काम करताना, चालताना हातापायाला छोटी जखम झाली तर ती दोन तीन दिवसात भरायला लागते, हे प्रत्येकाला कळतं. पण छोट्या जखमा भरायलाही शरीर जास्त वेळ घेत असेल तर त्याचा संबंध कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीशी असतो.  म्हणून सावध होवून डाॅक्टरांकडे जाणं हा योग्य उपाय ठरतो.


(संदर्भ :  लोकमत)


Monday, 3 January 2022

सोशल मीडिया आणि मेंदू


पहिली पिढी

जिच्या सामाजिक आंतरक्रिया आणि संवाद प्रामुख्याने ऑनलाईन जगात आकाराला येतात, अशी मानवी इतिहासातील पहिली किशोरवयीन पिढी आपण एकविसाव्या शतकात पाहतो आहोत. तिचे भावविश्व सोशल मिडियाने व्यापलेले आहे. या माध्यमाने देहाने दूर असणाऱ्यांना परस्परांच्या जवळ आणले. जीवनातल्या सुख-दु:खाला त्वरित व्यक्त करण्याची संधी दिली. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांची माहिती २४×७ पुरवायची जबाबदारी घेतली. आणीबाणीच्या प्रसंगात तात्काळ मदतीसाठीचे मार्ग उपलब्ध करून दिले. अन्न-वस्त्र-निवारा या शारीरिक गरजांइतकीच ‘संवाद’ ही मूलभूत मानसिक गरज असल्याने ती भागवण्याची मोठीच सोय करणारा हा ‘सोशल मिडिया’ आता केवळ त्यांच्याच नाही तर प्रौढांच्याही जीवनाचा अविभाज्य घटक बनू पाहतो आहे! मात्र, छोट्या-छोट्या सुखांचे आवळे सतत चाखायला देणाऱ्या या सोशल मीडियाला त्याबदल्यात आपण ‘बुद्धीचा कोहळा’ तर काढून देत नाही आहोत ना? प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण मेंदूचे अभ्यासक, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, सुजाण पालक या साऱ्यांनाच हा प्रश्न भेडसावतो आहे. एवढेच नव्हे, तर ज्यांनी हा उद्योग यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली त्यांनीही आता ‘जागल्या’ची भूमिका घेत या संभाव्य धोकयांचे स्पष्ट संकेत दिले आहेत.


हि खालील काही उदाहरणे पहा :

१. ‘मादक द्रव्यसेवन आणि जुगार खेळताना मेंदूतील जे चेतामार्ग उत्तेजित होतात, तेच मार्ग स्मार्टफोनवर सोशल मीडिया वापरताना उत्तेजित होतात’ – ख्रिस मारसिलिनो, ‘आय फोन’चे ‘पुश’ नोटिफिकेशन विकसित करणारा तज्ञ


२. ‘मेंदूतील डोपामाइन या चेतरसायनावर आधारीत तात्काळ सुख देणारी जुळणी खऱ्याखुऱ्या सामाजिक संवादास मारक ठरेल हे माहीत असूनही, याच मानवी कमजोरीचा फायदा घेत आम्ही ‘फेसबुक’चे आर्थिक साम्राज्य उभारले. त्याबद्दल मला प्रचंड अपराधी वाटते’. – चामथ पलिहापितीया, माजी व्हाईस प्रेसिडेंट, ‘फेसबुक’ ग्राहक वृद्धी विभाग


३. ‘अवधान क्षमतेचा ऱ्हास/नाश करणारी बलाढ्य अर्थव्यवस्था आम्ही निर्माण केलीयं. आता तिचे धोके समाजाला समजावून सांगत, तिचा सर्व पातळ्यांवर विवेकी वापर वाढावा यासाठी मी प्रयत्नशील आहे’. – ट्रायस्टन हॅरिस, प्रॉडक्ट व्यवस्थापक, ‘गुगल’ कॉर्पोरेशन


४. ‘स्क्रीनच्या वापराने होणाऱ्या अवधान क्षमतेच्या ऱ्हासापासून आपल्या देशाची पुढची पिढी वाचवण्यासाठी शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यावर बंदी घातलेली आहे’. – जिन-मिशेल ब्लॅक्वेर, फ्रान्सचे शिक्षण मंत्री (सप्टेंबर, २०१८ पासून हा कायदा तिथे अंमलात आलाय).


डोपामाईनवर आधारीत उद्योग...


मानवी उत्क्रांतीचा विचार केला तर सुख देणाऱ्या वर्तनाची माणूस पुनरावृत्ती करताना दिसतो. चविष्ट अन्नाची मेजवानी, लैंगिक सुख, केली गेलेली स्तुती अशा अनेक गोष्टींसाठी माणूस हपापलेला असतो. ते मिळाले की डोपामाईन नावाचे रसायन (तांत्रिक भाषेत चेतपारेषक) मेंदूत स्त्रवते आणि सुखाची अनुभूती येते. मात्र, हे हवहवेसे वाटणारे सुख तात्पुरत्या काळापुरते असते. त्यामुळे ते पुन्हापुन्हा मिळावे यासाठी माणूस खटपट करीत राहतो. नेमकी हीच मानवाची कमजोर बाजू सोशल मिडियाने विविध संशोधनांतून सखोल अभ्यासली आहे. त्यांचे फायद्याचे गणितच मुळात जाहिरातींवर आधारलेले असल्याने त्या मिळवण्यासाठी वापरकर्त्यांची नजर सतत स्क्रीनवर खिळवून ठेवण्याची आवश्यकता त्यांना आधी जाणवलेली होतीच. मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सुखाची झुळूक सतत निर्माण करण्यासाठी  ‘डोपामाइन’ कार्यन्वित करू शकणारे अत्युच्च दर्जाचे संगणकीय ‘अल्गोरीदम्स’ म्हणजेच प्रोग्राम्स या कंपन्यांनी बनवले आणि अब्जावधी डॉलर्सचा धंदा उभारला! विविध प्रकारचे भाव व्यक्त करणारे इमोजी, रंगीबेरंगी शब्दांच्या-चित्रांच्या-‘गिफ’च्या माध्यमातून केलेले कौतुक, ओळखीच्या व्यक्तींचे सकारात्मक संदेश, चोवीस तास नोटिफिकेशनची आणि अलर्टची सुविधा, भूतकाळातील स्मृतींचे कोलाज उपलब्ध करून देणे, लाईक्सची संख्या देणे, अनेकांशी संपर्क करण्यास सुचवणे, आवडीनिवडीनुसार विविध गोष्टी सतत पुरवत राहणे...किती गोष्टी सांगाव्यात! अशा सुखावणाऱ्या पर्यावरणाची करोडो लोकांना भुरळ पडली नसती तरच नवल! त्यातही तात्कालिक सुखाच्या पाठीमागे धावण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना तर सोशल मिडियाचे व्यसन लागणेही ओघानेच आले. कोरोनाच्या महामारीने यात भरच घातली आणि आता सोशल मीडिया नियमितपणे न वापरणारे शोधावे लागतील अशी स्थिती आहे.


माणसाची आवड सवयीत कशी बदलते आणि सवय व्यसनात कशी परावर्तित होते याबाबतचे अनेक सिद्धांत मानसशास्त्रातील संशोधकांनी प्रस्थापित केलेले आहेत. त्यातील स्कीनर नावाच्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने (याने पहिल्या महायुद्धात कबूतरांना प्रशिक्षण देऊन शत्रूपक्षांवर बॉम्ब टाकण्याचा प्रस्ताव अमेरिकन लष्कराला सादर केला होता.) प्रथम सिद्ध करून दाखवलेली ‘बदलती प्रबलन सारणी’ सोशल मीडिया कंपन्या सर्रास वापरताना दिसतात. यात वापरकर्त्याची आशा सतत वाढती राहील आणि तो पुन्हापुन्हा आपल्या वॉलवर येत राहील अशा पद्धतीने त्याला संदेश देण्याची व्यवस्था अतिशय सूत्रबद्ध रीतीने केलेली असते. त्यासाठी जागतिक दर्जाच्या तज्ञांची भलीमोठी फौज कंपन्यांच्या दिमतील असते. ‘डोपामाइन लॅब’ या कॅलिफोर्नियामधील कंपनीच्या अभ्यासानुसार इन्स्टाग्राम नव्या ग्राहकांना मिळणारे सुरुवातीचे ‘लाईक्स’ हेतूपूर्वक दडवून ठेवते की जेणेकरून वापरकर्त्यांचे मन खट्टू होईल आणि ते पुन्हापुन्हा ‘इन्स्टा’वर येतील. नंतर मग एकदम सारे ‘लाईक्स’ दाखवले जातात आणि डोपामाइनचा प्रवाह मेंदूत वाहू लागून ते खूप खुश होताना दिसतात! ‘फेसबुक’ यासाठी शब्दांचे रंग, उडणारे फुगे आदी अनेक क्लृप्त्या सतत लढवत असते. नोटिफिकेशन ‘ऑन’ ठेवण्याचे डिफॉल्ट सेटिंग यासाठीच तर असते. आता आपण म्हणू की छोटे-छोटे विरंगुळयाचे, संवादाचे, विनोदाचे, कौतुकाचे क्षण आपल्याला सोशल मीडिया उपलब्ध करून देत असेल तर छानच आहे की. त्यात बिघडले कोठे? तर्क खरंच बिनतोड आहे पण जरा गंभीर विचार केला तर दुसरी बाजूही समोर येते.


... अवधानक्षमतेचा ऱ्हास


एकाचवेळी अनेक कामांमध्ये लक्ष विभागले जात असेल तर ‘समग्रतेकडून सूक्ष्माकडे’ जाण्याचा प्रक्रियेस खीळ बसते. आपली खोलात जाऊन आकलन करण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि दीर्घकालीन स्मृती विकसित होण्यात अडथळा निर्माण होतो. खरेतर कोणत्याही कामातली अत्युच्च गुणवत्ता गाठण्यासाठी त्यात खोलवर बुडी मारावी लागते. आजूबाजूची सारी व्यवधाने गळून पडावी लागतात आणि दीर्घकाळ एकाग्रचित्ताने कार्यरत व्हावे लागते. त्यातूनच  सर्जनशील आनंदाची आणि सार्थकतेची अनुभूती येते. सोशल मिडियावर दीर्घकाळ राहणारी मंडळी या अनुभूतीला पारखी होत आहेत अशी अनेक संशोधने सांगत आहेत (उदा. ली, २०१५). त्यांच्या मेदूतील ऍन्टिरिअर सिंग्यूलर कॉर्टेक्समधील ग्रे मॅटरची दिसून आलेली कमतरता याचेच निदर्शक आहे. नोमोफोबिया (नो मोबाईल फोन फोबिया) असणाऱ्या कुमारांच्या मेंदूमध्ये ‘गाबा’ रसायनाची अतिरिक्तता आणि ‘ग्लुटामेट-ग्लुटामाइन’ची कमतरता आढळल्याने अवधान केंद्रित करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दक्षिण कोरियन विद्यापीठातील अभ्यासात दिसून आले आहे. कोणतेही काम करत असताना १५ सेकंदांपेक्षा जास्त काळ इतर गोष्टींकडे आपले अवधान गेल्यास मुख्य कामामधल्या चुकांची संख्या लक्षणियरीत्या वाढते असे अनेक संशोधनांचे एकत्रित निष्कर्ष सांगतात. २००० ते २०१३ या कालावधीत कॅनडामधील लोकांच्या अवधान क्षमतेमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाल्याचा निष्कर्ष ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या २०१५ च्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलने सोशल मिडियाच्या वापरवृध्दी बरोबरच अवधान अक्षमतेने बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येतही प्रचंड वाढ होत असल्याचा इशारा दिला आहे. चीनमधील ७००० शालेय विद्यार्थ्यांवरील संशोधनातूनही असेच निष्कर्ष हाती आलेले आहेत. सततच्या सोशल मिडियामध्ये डोकावण्याच्या सवयीमुळे कामातली एकाग्रता वारंवार भंग पावत आहे. त्यामुळे  उत्पादक कार्याचा कालावधी जवळपास ४० टक्क्यांनी कमी होत असून (उदा. मेयर) भविष्याचा सारासार विचार करून बौद्धिक नियमन करणाऱ्या मेंदूमधील प्री-फ्रन्टल कॉर्टेक्सच्या कार्यात गोंधळ निर्माण होतो आहे (लोह व कानाई, २०१५, मोईसाला व सहकारी, २०१६). ‘जगाशी जोडले जात आहोत’ या क्षणभंगूर सुखाच्या लकेरीत बहुतेकांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.


सोशल मिडियामुळे आपल्याला हवी ती माहिती, फोटो, व्हिडिओ इ. कधीही उपलब्ध होऊ शकणार असल्याने प्रत्यक्ष अनुभव घेताना करावयाचे सूक्ष्म निरीक्षण, होणारी तरल भावनांची निर्मिती, त्रिमीतिय अवकाशाचा विचार आणि त्यातून जगावायचे वर्तमान याकडे माणूस दुर्लक्ष करू लागला आहे. परिणामी, नव्या पिढीला ‘डिजिटल स्मृतिनाश’ नावाच्या नव्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची भीती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत (काहानमान, २०११; कासपेरस्की लॅब, २०१५). वास्तविक पाहता, हा ‘केवळ व्यत्यय’ नाहीयं. तो आपल्या मनात एकाचवेळी आपण खूप गोष्टी करतो आहोत असा भ्रमित आनंद निर्माण करतो आहे आणि प्रत्यक्षात मात्र आपल्याला प्राधान्याने करावयाच्या गोष्टींपासून भरकटायला लावतो आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे.


ताण – भीती – बर्नआउट - नैराश्य...


जेव्हा आपण समाज माध्यमावर सतत सक्रीय राहतो तेव्हा मेंदूकडून ग्लुकोजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे, सततचा ताण, मानसिक ओझे, काम करताना लवकर थकायला होणे, बर्नआउट/कार्य-क्लांती, सहनशीलता कमी होऊन चटकन चिडचिड होणे आदी वर्तनातील बदल होताना दिसत आहेत. मेंदूत ‘ताण-भीती व त्यांची स्मृती’ असे जाळे विकसित होऊन चिंता, नैराश्य, विचारांमधील अस्पष्टता, वास्तवातील सामाजिक संवाद करताना येणारे अडथळे, झोपेच्या समस्या आदी तक्रारींमधील वाढीबाबतही अनेक संशोधने आपल्याला जागे करू पाहात आहेत (अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन सर्वेक्षण; कंझ्यूमर मोबिलिटी रिपोर्ट, २०१५; मॅक्स विन्टरमार्क, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, स्टॅनफोर्ड विद्यापीठ; ह्यूंग सुक सिओ, न्यूरोरेडिओलॉजिस्ट, कोरिया; लस्टिंग, एंडोक्रोनोलॉजिस्ट).    


विचारप्रक्रियेचे ध्रुवीकरण


सोशल मिडियाच्या वापरकर्त्याला हवी तेवढी पण एकाच प्रकारची माहिती सतत पुरवत राहण्याच्या व्यावसायिक गरजेमुळे आभासी दुनियेतील संवादामध्ये समाजाचे वैचारिक ध्रुवीकरण होतानाही दिसते आहे. समोरासमोर होणाऱ्या संवादातील संवेदनशीलता, आपुलकी, आदर कमी होत जाऊन माणसे आक्रमक, तर्कदुष्ट आणि एकारलेपणाकडे झुकत आहेत. मेंदूमध्ये विचारांचे पूर्वग्रहात आणि कट्टरतेत रूपांतर होऊन सामाजिक सौहार्द आणि विविधतेचा आदर कमी होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोशल मिडियाच्या बेलगाम व्यवहारावर वाजवी बंधने घालण्याबाबत जनमत तयार करण्याच्या चळवळी हळूहळू मूळ धरू लागल्या आहेत.        


विवेकी वापर शक्य आहे


मानवाच्या प्राणीय स्तरावर कार्यरत असणाऱ्या ‘तात्काळ सुख’ मिळवण्याच्या सहजप्रवृत्तीला समाज-माध्यमांमधून आता ‘सामाजिक दर्जा/स्टेटस’चे रूप प्राप्त झाले आहे. ह्या ‘आभासी दर्जा’मध्ये अडकून न राहता अधिक तारतम्याने वागण्याची निकड समजावून घेण्याची आता हीच वेळ आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या चौथ्या क्रांतीचा हा संक्रमणकाळ आहे. अशा संक्रमणकाळात नेहमीच ‘जुने ते सारे कालबाह्य’ आणि ‘नवे ते सारे सोने’ वाटत असते. अशावेळी योग्य काय अन् अयोग्य काय, चूक काय अन् बरोबर काय, इष्ट काय अन् अनिष्ट काय हे ठरवता येणारा सारासार विवेक निरंतर प्रयत्नांनी रूजवावा लागतो. वैज्ञानिक निरीक्षणांचा आधार इथे विशेषत्वाने उपयुक्त ठरतो. सोशल मिडियाने मेंदूलाच ‘लक्ष्य’ केल्याने अवधानक्षमतेबाबत आधुनिक विज्ञान काय सांगते हे पाहणे म्हणूनच कळीचे आहे. ज्याप्रमाणे पैसा हे आर्थिक व्यवहाराचे चलन आहे आणि ते काटकसरीने वापरून आपण आपली प्रगती साधायला शिकलो त्याप्रमाणेच ‘अवधानक्षमता’ हे बौध्दिक व्यवहाराचे चलन आहे! निसर्गाने आपल्याला ते मर्यादीत स्वरूपात दिलेले आहे हे उत्क्रांतीच्या वैज्ञानिक अभ्यासात अधोरेखितही झालेले आहे. सोशल मिडियाच्या आहारी जाऊन तिची उधळपट्टी न करता आपल्या संपन्न आणि समाधानी आयुष्यासाठी ते पैशासारखेच जपून वापरणे म्हणूनच शहाणपणाचे ठरणार आहे. उन्नत अशी मानवी स्तरावरील दीर्घकालीन उद्दिष्टांची निर्मिती करणे, ध्येयपूर्तीसाठी निरंतर ‘लगे रहो’ची वृत्ती घडवणे, प्रतिकूल परिस्थितीतही निर्धाराने उभे राहण्याची ताकद कमावणे आदींसारख्या कुवती विकसित करण्यासाठी अवधानक्षमतेचाच प्रमुख आधार आपल्याला असणार आहे. जागतिक स्पर्धेचे २१ वे शतक छोट्या-छोट्या मोहांना वा व्यत्ययांना बळी न पडता ठरवलेल्या कार्यावर दीर्घकाळाकरता लक्ष केंद्रित करून ते उत्कृष्टरित्या पार पाडणाऱ्यांनाच करिअर बहाल करणार आहे. ‘सोशल मिडियाची आकर्षक भूल’ विरुद्ध ‘स्वयं-शिस्तीचे व्यवधान’ या नव्या द्वंद्वाची सोडवणूक कठोर आत्मपरीक्षणाने शक्य होणार आहे. नोटिफिकेशन ऑफ करणे, स्क्रीनचा प्रकाश मंद करणे, उठसूट स्क्रीन पाहून संदेश पाठवण्यावर लगाम घालणे आदींसारख्या नव्या सवयी आता अंगिकाराव्या लागणार आहेत. स्मार्टफोनमध्ये व्यसनी बनविण्याचे अंगभूत गुण असल्याने आपण ‘मानसिक आजारी तर बनत नाही ना’ हा प्रश्न रोखठोक पद्धतीने विचारावा लागणार आहे. सोशल मिडियावर जाण्याऐवजी पुस्तक वाचणे, वाद्य वाजवणे, मैदानावर खेळणे, न थांबता सलग ३० मिनिटे लिहीणे, गाणे गाणे, व्यायाम करणे, नवी भाषा शिकणे, छंदासाठी पुरेसा वेळ देणे, छोटे- छोटे समाजोपयोगी कार्य करणे, ध्यान करणे, निसर्गात भटकंती करणे, फोटोग्राफी करणे, चित्रे काढणे, नृत्य करणे... अशा कितीतरी उत्पादक गोष्टींची कास धरावी लागणार आहे. दिवसातून विशिष्ट वेळीच सोशल मिडियावर जाणे आणि आठवड्यातून काही दिवस ‘नो सोशल मीडिया डेज’ म्हणून साजरे कराणे ही काळाची गरजसुद्धा ओळखावी लागणार आहे. मेंदूचे आरोग्य तो तरतरीत, तल्लख आणि सर्जनशील राहण्यात आहे ही खूणगाठ मनाशी बांधून आपण सोशल मिडियाचा विवेकी वापर करू शकलो तरच नवे तंत्रज्ञान रुजवू पाहात असलेल्या माहिती-क्रांतीच्या संक्रमणकाळाला सकारात्मक प्रतिसाद दिला असे आपण ठामपणे म्हणू शकू.


- प्रा. डॉ. शिरीष शितोळे, मानसशास्त्र विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर

आयुष्य संपवण्याचे विचार मनात कसे येतात आणि ते कसे रोखावेत?

        आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्...